भुसावळ | राजेश तायडे
भुसावळ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यानंतर या मतदारसंघातून निवडून आलेले संजय सावकारे आज मंत्रीपदावर विराजमान आहेत. मात्र, “मला जे सुख-वैभव मिळाले, ते महादेवाच्या आशीर्वादामुळे मिळाले”, या त्यांच्या कथित वक्तव्यामुळे आरक्षण, आंबेडकरी विचार आणि राजकीय प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावरून नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. सावकारेंच्या या वक्तव्यावर काही आंबेडकरी विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर सावकारे हे कुटुंबीयांसह तालुक्यातील वेल्हाळा येथील हेमाळ महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या आमदारकीपासून मंत्रीपदापर्यंतच्या प्रवासाचे श्रेय जागृत महादेवाच्या आशीर्वादाला दिल्याचे सांगितले.
या वक्तव्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासामागील सामाजिक आणि घटनात्मक संदर्भ पुन्हा चर्चेत आला आहे.
आरक्षणामुळे मिळालेल्या राजकीय संधीची चर्चा
भुसावळ विधानसभा मतदारसंघ २००९ पासून अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. भारतीय राज्यघटनेने वंचित समाजघटकांना राजकीय प्रतिनिधित्वाची संधी मिळावी, यासाठी आरक्षणाची तरतूद केली आहे. याच आरक्षित मतदारसंघातून संजय सावकारे यांनी विधानसभा निवडणूक लढवून राजकीय कारकीर्द सुरू केली आणि पुढे मंत्रीपदापर्यंत मजल मारली.
त्यामुळे “राजकीय यशाचे श्रेय दैवी आशीर्वादाला द्यायचे की घटनात्मक आरक्षणामुळे उपलब्ध झालेल्या संधीला?”, असा प्रश्न काही आंबेडकरी विचारवंतांकडून उपस्थित केला जात आहे.
सावकारेंचा राजकीय प्रवासही चर्चेत
संजय सावकारे यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात माजी आमदार संतोष चौधरी यांच्या राजकीय वर्तुळातून झाल्याचे या परिसरातील राजकीय जाणकार सांगतात. २००४ च्या काळात ते चौधरी यांच्याकडे वैयक्तिक पीए म्हणून कार्यरत होते.
मतदारसंघ पुनर्रचनेनंतर भुसावळची विधानसभा जागा अनुसूचित जातीसाठी राखीव झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी विविध नावांची चर्चा झाली होती. कंडारी गावचे सरपंच महेंद्र यशोदे यांचेही नाव संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असल्याचे सांगितले जाते. मात्र अखेरीस संजय सावकारे यांना उमेदवारी मिळाली आणि भुसावळकरांनी त्यांना विधानसभेत पाठवले.
यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाला वेग आला. आरक्षित मतदारसंघातून मिळालेल्या राजकीय संधीचे रूपांतर त्यांनी पुढे मंत्रिपदापर्यंत केले.
आंबेडकरी विचारवंतांचा सवाल : श्रेय नेमके कुणाला?
सावकारेंच्या महादेव मंदिरातील वक्तव्यामुळे आता केवळ धार्मिक श्रद्धेचा प्रश्न राहिलेला नसून, राजकीय प्रतिनिधित्व आणि घटनात्मक आरक्षणाच्या भूमिकेवरही चर्चा सुरू झाली आहे.
आंबेडकरी विचारसरणीनुसार सामाजिक आणि राजकीय वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मक मार्गाने दिलेल्या अधिकारांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आरक्षित मतदारसंघातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने आपल्या राजकीय यशाचे श्रेय दैवी शक्तीला दिल्याने काही विचारवंतांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
मात्र, सावकारेंची वैयक्तिक धार्मिक श्रद्धा हा त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे, याचाही विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे श्रद्धा विरुद्ध संविधान असा सरळ संघर्ष म्हणून पाहण्याऐवजी, लोकप्रतिनिधींनी आपल्या राजकीय प्रवासाचे श्रेय कोणत्या मूल्यांना आणि व्यवस्थेला द्यावे, यावर ही चर्चा केंद्रित होत आहे.
श्रद्धा वैयक्तिक; आरक्षण हा घटनात्मक अधिकार
संजय सावकारे यांचे महादेवावरील श्रद्धेचे वक्तव्य त्यांच्या वैयक्तिक धार्मिक भावनेचा भाग असू शकते. मात्र, त्यांनी ज्या आरक्षित मतदारसंघातून राजकीय प्रतिनिधित्व मिळवले, त्या आरक्षणामागील घटनात्मक उद्देश आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान हा वेगळा आणि महत्त्वाचा सामाजिक संदर्भ आहे.
याच कारणामुळे सावकारेंच्या वक्तव्याने भुसावळच्या राजकीय वर्तुळात तसेच आंबेडकरी विचारविश्वात “श्रद्धा आणि संविधानिक अधिकार यांच्यातील सीमारेषा नेमकी कुठे आहे?”, हा प्रश्न चर्चेत आला आहे.














