लातूर |द सिटिझन मिरर | विशेष वृत्त:-
महाराष्ट्रात प्रेमसंबंधातून उभ्या राहिलेल्या वादाचा धक्कादायक शेवट समोर आला आहे. प्रियकरासोबत झालेल्या वादानंतर एका महिलेने त्याच्यावर उकळते तेल ओतल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली असून आहे. प्राथमिक माहितीनुसार, महिला आणि मृत व्यक्ती यांच्यात काही काळापासून प्रेमसंबंध होते. मात्र अलीकडील काळात दोघांमध्ये मतभेद वाढले होते. याच पार्श्वभूमीवर झालेल्या तीव्र वादानंतर महिलेने संतापाच्या भरात उकळते तेल प्रियकराच्या अंगावर ओतल्याचा आरोप आहे. गंभीर भाजल्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
काय आहे नेमकी घटना
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील नबंडी गावचा रहिवासी असलेला २१ वर्षीय उद्धव मारोती दहीकांबळे आणि वंदना मदाळे (वय ४५) यांच्यात प्रेमसंबंध होते. वंदना ही विवाहित असून ती काही काळापासून तिच्या पतीपासून वेगळी राहत होती. उद्धव याच्या नावावर असलेल्या जमिनीचा आणि मालमत्तेचा हिस्सा स्वतःच्या नावावर करण्यासाठी वंदना त्याच्याकडे सातत्याने तगादा लावत होती. याच मालमत्तेच्या वादातून त्यांच्यात वारंवार भांडणे होत असत. उद्धव याच्या उदगीर येथील भाड्याच्या खोलीत या दोघांमध्ये पुन्हा एकदा याच कारणावरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात वंदनाने घरात असलेले उकळते तेल उद्धवच्या अंगावर ओतले. या भीषण हल्ल्यात उद्धव गंभीररित्या भाजला गेला.उपचारादरम्यान मृत्यू आणि पोलिसांची कारवाईघटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या उद्धवला तात्काळ लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.उद्धवच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलिसांनी तपास चक्र फिरवली. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धवच्या मृत्यूनंतर पोलिसांनी आरोपी महिला वंदना मदाळे हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला असून महिलेला अटक करण्यात आली असून न्यायालयाने आरोपी महिलेला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.













