जळगाव | द सिटिझन मिरर
उत्तर महाराष्ट्रासह तापीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हतनूर धरणातील जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली असून प्रशासनाने धरणाचे २२ दरवाजे उघडत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे तापी नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. वाढता जलसाठा लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने धरणाचे २२ दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला. परिणामी तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या नागरिकांनी अनावश्यकपणे नदीपात्रात जाणे, मासेमारी करणे किंवा जनावरे पाण्यासाठी नदीकडे नेणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून आवश्यकतेनुसार विसर्गात बदल होऊ शकतो. हवामान विभागानेही पुढील काळात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, हतनूर धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे तापी नदीकाठच्या गावांमध्ये खबरदारीचे उपाय वाढविण्यात आले असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे.














